देशाच्या 75 व्या स्वतंत्रता दिनानिमित्त क्रांतीकारकांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती व्हावी तसेच त्यांच्या कार्याचा नव्याने उजळणी व्हावी यासाठी सांगली जिल्हा कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजित आझादी गौरव यात्रेस आज कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मारकास अभिवादन करून सुरूवात करण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सांगली जिल्ह्यातील क्रांतीकारकांनी अतुल्य योगदान दिले. ऑगस्ट 1942 मध्ये महात्मा गांधीजींनी करो वा मरो असे देशवासियांना आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हातील हजारो ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यासाठी अनेकांनी तुरूंगवास पत्करला, प्रसंगी रक्त सांडले. क्रांतीकारकांचा त्याग, बलिदान, देशवासीयांप्रती त्याचे उत्कट प्रेम अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे. आज ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे जन्मस्थळ देवराष्ट्रे येथील चव्हाण साहेबांच्या स्मारकास अभिवादन करून सुरूवात करण्यात आली याबद्दल नक्कीच आनंद होतोय.
यावेळी समवेत माजी राज्यमंत्री तथा पलुस-कडेगावचे आ. मा. विश्वजीत कदम, जतचे आ. मा. विक्रम सावंत, सांगली शहर कॉंग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





![]()
